महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हयात शिर्डीजवळ असणाऱ्या राहाता तालुक्यात असणारे दहेगाव हे छोटेसे गाव. याच गावात १ ऑगस्ट १९५२ रोजी श्री इंद्रभानजी डांगे यांचा जन्म झाला. वडील शेतकरी असल्याने घरची परिस्थिती बेताचीच अठराविश्व दारिद्रय काढीत होती. वडीलांच्या अकाली मृत्युने मोडकळीस आलेल्या संसाराचा खांब बनून अनंत यातना झेलत त्यांनी मराठी माध्यमातुन शिक्षण घेतले. हे शिक्षण घेतानांही आर्थिक अडचण मुळे त्यांना अनेक शाळा सोडून दुसऱ्या शाळामध्ये प्रवेश घ्यावा लागला. गरीबीचे चटके सहन करत बी.कॉम पर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. हाताला काम व घरादारातील दुःख हटवण्यासाठी दाम मिळावे म्हणून विविध ठिकाणी नोकरी केली. परंतु काम मिळाले नाही. भावांना सांभाळण्याची जबाबदारी तसेच शिक्षण, बेकारी व्यवसायसासाठी पैसे मिळत नव्हते. अशावेळी आत्महत्येचा विचार मनात आला. परंतु सुदैवाने एका नातेवाइकाच्या सल्ल्याने आत्महत्येचा विचार सोडून देण्यात आला व १९७३ साली राहाता येथे भाडोत्री खोलीत दहा पैशाच्या अडीच खडूंनी डांगे क्लासेसची सुरुवात झाली.
अन्नाच्या भुकेत विचारांची भुक येऊन मिळाली म्हणजे क्रांतीची सुरुवात होते. अशीच क्रांती दहा पैशाच्या अडीच खडूंच्या माध्यमातुन घडवणाऱ्या श्री. इंद्रभानजी डांगे यांच्या अलौकिक शिक्षण ध्यासाचा अचुक बॅलन्सशीट म्हणजे त्यांचा डांगे पेंटर्न. गेल्या चाळीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या व अनेक शिक्षण संस्थाना दीपस्तंभ बनुन मार्गदर्शन करणाऱ्या शिर्डी जवळील राहाता येथील साध्वी प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक श्री इंद्रभानजी डांगे यांच्या डांगे पॅटर्नचा व त्यांच्या कार्याविषयीचा घेतलेला आढावा.
दहेगावासारख्या खेड्यात जन्म झालेल्या इंद्रभानजी डांगे यांनी शैक्षणिक क्षेत्रात सतत वेगवेगळे प्रयोग करून आमुलाग्र बदल घडवून आणलेला आहे. आपण ज्या समाजात राहतो. त्या समाजाकडुन आपण अनेक गोष्टी आत्मसात करत असतो. समाजात राहूनच माणसाचे जीवन समृद्ध होत असते. समाजातील चांगल्या वाईट गोष्टीचा प्रभाव जीवनभर पडणे साहजिकच आहे. समाजाकडून मिळणाऱ्या चांगल्या गोष्टी आपण घेतोच. परंतु हे ऋण आपल्याला फेडणे आवश्यक आहे. त्याऋणातून मुक्त होणे आवश्यक आहे.
शिक्षणातून व्यक्तिमत्वाचा विकास साधायचाच असतो. परंतु या विकासासोबत समाजविकासही साधणे आवश्यक आहे.समाजातीलदुर्बल घटकांना, मागास घटकांना समाज प्रवाहात आणणं अनिष्ठ रूढी अन परंपरा नष्ट करणे, पर्यावरण संतुलन, कुप्रथांना विरोध, भारतीय लोककलांचे संवर्धन तसेच संस्काराचे जतन करणे यासाठी प्रयत्न करण हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे हे कर्तव्य पार पाडत असताना आपल्या समाजसेवेनं निर्भेळ सेवा घडावी व समाज प्रगतीपथावर यात्रा समाजातील दैन्य नष्ट होऊन प्रत्येकाला समाधान प्राप्त व्हावे यासाठीश्री इंद्रभानजी डांगे यांनी केलेले सामाजिक कार्य हे अप्रतिम असेच आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याविषयीचा आढावा...
व्यसन हे कोणतेही असेल तर ते शरीराला हानीकारक असते परंतु दारु हे असे व्यसन आहे की जे सेवन करणाऱ्याच्या शरीरास हानीकारकच आहे. परंतु समाजालाही हानीकारक आहे. मद्यपान करणाऱ्या लोकांमुळे कुटुंबाची वाताहत तर होतेच परंतु समाजाचेही स्वास्थ्य बिघडते जी व्यक्ती दारूचे व्यसन करते तिच्यामुळे तिच्या आजुबाजुच्या परिसरात राहणाऱ्या सर्वांनाच त्यांच्या या व्यसनाचा त्रास सहन करावा लागतो.
समाजाच्या प्रगतीला अटकाव करणारे मद्यपानाचे व्यसन आपल्या गावातील कोणालाच नको व परिसरातील गावतही नको यासाठी श्री इंद्रभानजी डांगे यांनी केलेले कार्य अद्वितीय असेच आहे. दारुच्या व्यसनामुळे दहेगावमध्ये दर दोन चार दिवसांनी भांडणे आणि मारामारी होत. संध्याकाळच्या वेळी मद्यपींमुळे गुण्यागोविंदाने राहणाऱ्या गावात अशांतता निर्माण व्हायची.भांडणे व्हायची हा प्रकार बंद करण्यासाठी इंद्रभानजी डांगे यांनी विशेष प्रयत्न केले दहेगावातील व आजूबाजूच्या गावातील वयस्क मंडळीना समजावून दारूबंदी केली.
मातृदेवो भव: म्हणून आईला ईश्वर मानणाऱ्या भारतीयांची संस्कृती फार महान अशी आहे. आईने बालकांसाठी सोसलेले कष्ट ज्याचे मोजमाप होऊच शकत नाही म्हणून तर आईला सर्वश्रेष्ठ मानले जाते. आई इतकेच महत्व बहीणीलाही आहे.
आई व बहीण या मुकुटमणी म्हणुन मिरविणाऱ्या या देशात अनेक खेड्यामध्ये गावामध्ये शहरांमध्ये त्यांचा उल्लेख असणारे अपशब्द वापरले जावू नयेत म्हणून संपूर्ण भारतात राबविला जावा असा शिवी बंदी प्रकल्प इंद्रभानजी डांगे यांनी राहाता व पंचक्रोशीत सुरू केला. लोकांनी आपसात भांडु नये वादविवाद रोखता येतच नसेल तर किमान भांडणात केली जाणारी अर्वाच्य शिवी बाजी नको. शिवीमुळे समोरची व्यक्ति चिड़ते व हाणामारीपर्यंत वाद विकोपाला जातो. श्री इंद्रभानजी डांगे यांनी हा विचार गावकऱ्यांमध्ये रुजवला कोणतेही कारण असो शिवी द्यायची नाही याविषयी जनजागृती केली व परिसरातील गावामध्येही शिवी बंदी उपक्रम राबवण्यात आला. अशाप्रकारे शिवीबंदी हा प्रकल्प म्हणजे श्री इंद्रभानजी डांगे यांनी दिलेले समाजासाठी वरदानच आहे.
छोटी मोठी खेडी व शहरे जोडुन अखंड भारताची निर्मिती करण्यात आलेली आहे. या आनंदी खेड्यांना कौटुंबिक कलह सामाजिक, आर्थिक आणि राजकिय या बाधांमुळे ग्रहण लागत आहे. प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी जपणारी माणसंच जेव्हा आपली न राहता परस्परांमध्ये वाद घालतात. तेव्हा होणारे दुख हे खुप मोठे असते प्रत्येक घरांत असणारे लहान वाद हे उग्र रूप धारण करतात. म्हणून सामोपचाराने वाद नष्ट करून तंटामुक्त ग्राम संकल्पना श्री इंद्रभानजी डांगे यांनी १९७२-१९७३मध्ये राबविली.
राहाता, दहेगाव, पिंपळस परिसरांतील गावामधुन जर पोलिस स्टेशनला वर्षभर एकही तक्रार गेली नाही तर अशा गावांना बक्षिसे देण्याच घोषित केले. त्यामुळे परस्परांमधील मतभेद कमी होण्यासाठी मदत झाली तसेच खेड्यामधील वाद संवादाने सोडविले गेल्यामुळे तंटामुक्त ग्राम संकल्पना ही फलदायी झाली. श्री इंद्रभानजी डांगे यांच्या या तंटामुक्त गाव संकल्पनेमुळे गावातील वाद संपुष्टात आलेच परंतु गावाच्या विकासासाठी विविध योजनाही आखण्यात आल्या व त्याची अंमलबजावणीही करण्यात आली.
श्री इंद्रभानजी डांगे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन व साध्वी प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलातील विविध उपक्रम बघुन अनेक शिक्षण संस्थानी डांगे पॅटर्न चा अंगिकार केलेला आहे. डांगे पॅटर्न अंतर्गत महाराष्ट्रात धुळे, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर व राहाता इ.ठिकाणी सुमारे २५ स्कुल्स सुरु झालेल्या आहेत. अहमदनगर जिल्हयातील पारनेर, श्रीगोंदा, संगमनेर, अकोले, पाथर्डी, अहमदनगर व राहाता तालुक्यात डांगे पॅटर्न अंतर्गत चालणाऱ्या शाळा सुरु झालेल्या आहेत.